ईव्हीएमवरून वंचित बहुजन आघाडीचे आक्रमक आंदोलन, स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

विशेष प्रतिनिधी

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या निकालांनंतर ईव्हीएमवरील संशय तीव्र केला आहे. “सामान्य माणसालाही वाटू लागले आहे की ईव्हीएममध्ये गडबड आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली आहे.

आंबेडकर म्हणाले, “ईव्हीएमला मान्यता जबरदस्तीने लादण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रे हॅक होऊ शकतात, हे त्यांच्या निर्मात्यानेही मान्य केले आहे. मागील काही वर्षांत मुंबई उच्च न्यायालयात ईव्हीएम चोरी प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावर अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.”

महाराष्ट्रातील अनपेक्षित निकालांकडे निर्देश करत आंबेडकर म्हणाले, “ज्या उमेदवाराला गावात पाय ठेवू दिले जात नव्हते, त्याच गावातून त्याला मोठ्या प्रमाणावर मते मिळाली. हे संशयास्पद आहे.” काही उमेदवार एफिडेव्हिटच्या आधारे या प्रकाराचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

आंबेडकरांनी काँग्रेसवरही टीका केली. “ईव्हीएम प्रकरणी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही, तर आम्ही 10 तारखेपर्यंत वाट पाहून पुढाकार घेऊ. तसेच ईव्हीएमविषयी सर्वोच्च न्यायालयात कोणी जाऊ नये, कारण तसे करणाऱ्यांना भाजपाचे दलाल समजले जाईल,” असे ते म्हणाले.

29 नोव्हेंबरपर्यंत सरकारचा शपथविधी आणि नवीन सभागृह स्थापन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “याबाबत महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट जनरलने उत्तर द्यावे,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Aggressive movement of Vanchit Aghadi on EVM : Prakash Ambedkar

महत्वाच्या बातम्या