विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील यांनी शरद पवार गटाचा किल्ला लढविला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नेही पडू लागली होती. मात्र महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने आता जयंत पाटीलही अजित पवार गटाची साथ देताहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत आज विधानसभेत जयंत पाटील यांनी सूचक विधानही केले. Jayant Patil told Ajit Pawar
सभागृहात चर्चा सुरू असताना अजित पवार जयंत पाटील यांना म्हणाले माझं लक्ष आहे. तुम्ही कधी प्रतिसाद देताय? त्यावर आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे दादा. योग्यवेळी योग्य निर्णय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
जयंत पाटील यांनी भाषणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुकही केलं. आपण अडीच वर्ष उत्तमपणे काम केलं. सर्व बाजूने बोललं जातं, ते ऐकावं असं मी तिकडे असताना म्हटलं होतं. त्यावेळी वाटायचं अध्यक्षांना डाव्या बाजूला ऐकायला कमी येतं. झिरवळ उपाध्यक्ष झाले. तेव्हा तिकडच्या बाजूला होतो. तेव्हा एका बाजूने कमी ऐका असं मी झिरवळ यांना विनोदाने म्हटलं होतं. पण तुम्ही अडीच वर्षात दोन्ही बाजूने ऐकत होता. तुम्ही संख्याबळावर काही बोट ठेवलं नाही. तोच स्वभाव तुमचा कायम राहिल अशी अपेक्षा आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आज तिघांची भाषणे झाली. पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषण मुख्यमंत्र्यांचं आहे का असं वाटावं अशी वेळ आली. प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. तो कुलाबा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात लहान मतदारसंघ आहे. सर्व जाती धर्माचे लोक या सभागृहात राहतात. मच्छिमार या मतदारसंघात राहतात. अतिक्रमण कसं करायचं याचा ‘आदर्श’ याच मतदारसंघात आहे. तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आला त्याबद्दल अभिनंदन करेल. सलग दुसऱ्यांदा तुम्ही अध्यक्ष झाला. मी तुम्हाला खासगीत सांगायचो परत संधी मिळाली तर मंत्री व्हा. मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो. तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल. पण तो तुमच्या पक्षाचा निर्णय आहे, असं जयंत पाटील यांनी म्हणताच हास्यकल्लोळ झाला.
जयंत पाटील म्हणाले, अध्यक्ष उभे राहिले तर विधानसभेचे सदस्य आत येताना तिथेच उभे राहायचे. आता अध्यक्ष उभे राहतात, बोलतात. तरीही सदस्यांची सभागृहात ये-जा सुरू असते. आता तुम्ही कडक व्हा. सर्व सदस्यांना पत्र पाठवा. प्रोटोकॉल पाळायला सांगा. त्यात मीही आलो. खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्या. अमेरिकेत क्लॉक सिस्टिम आहे. पाच मिनिटं झाली की गजर होतो. सदस्य बोलायचे थांबतात. तुम्हीही स्टॉप वॉच ठेवा. सदस्यांना 10 ते 15 मिनिटांचा वेळ द्या. किती काळ चर्चा करायची याला मर्यादा असते. असे काही नवीन नियम गट नेत्यांची बैठक घेऊन कराल अशी आशा आहे, अशी सूचना जयंत पाटील यांनी अध्यक्षांना केली.